परभणी, २४ ऑक्टोबर २०२५ – समाजसेवेसाठी कार्यरत जीवन दूत या चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आज परभणी येथे गरजू नागरिकांसाठी फळवाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या उपक्रमात संस्थेचे अध्यक्ष मोहसीन खान , विश्वस्त मंडळाचे सदस्य, कार्यक्रमाचे आयोजक (Programme Manager)तसेच संस्थेचे महाराष्ट्र राज्य संघटक शेख आयुब शेख रशीद आतार ,महिला संघटक आफ्रिन शेख आयुब व अफ्रिन सुलतान शेख कलीम व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचा उद्देश गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपर्यंत आरोग्यदायी आणि पौष्टिक आहार पोहोचविणे हा होता.
कार्यक्रमादरम्यान सफरचंद, केळी, संत्री, पेरू आणि इतर हंगामी फळांचे वितरण करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष मोहसीन खान (एम जे मास मीडिया ) म्हणाले, “आरोग्य हेच खरे धन आहे. आपल्या समाजातील प्रत्येक व्यक्ती निरोगी राहावी, यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.”
स्थानिक नागरिकांनीही या सामाजिक उपक्रमाचे मनःपूर्वक स्वागत केले आणि संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. लवकरच संस्थेकडून अशाच आणखी उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे विश्वस्तांनी सांगितले.
राज्यात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर दिवाळीआधी शेतकऱ्यांना मदत देण्यास सरकारकडून सुरुवात झाली आहे.
farmer using mobile checking report of agriculture in farm
Heavy Rain Affected Farmers Assistance : काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाडा तसेच विदर्भ आणि महाराष्ट्रातील इतर भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी जमीन खरडून गेली. तर काही ठिकाणी शेतातील उभे पीक पाण्याखाली गेली. हे नुकसान लक्षात घेऊन सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 31 हजार कोटींची आर्थिक मदत जाहीर केली. ही मदत नेमकी कधी मिळणार याबाबत अनिश्चितता होती. आता मात्र याबाबतचा संभ्रम दूर झाला आहे. सरकारने एक आदेश जारी केला आहे. या आदेशात सरकारने 480 कोटी रुपयांच्य वाटपास मंजुरी दिली आहे. म्हणजेच आता शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीआधाची पैसे येण्याची शक्यता वाढली आहे. दिवाळीपूर्वीच पैसे वाटपाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
राज्यात पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, मात्र त्याचपूर्वी महायुतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्याच्या वक्तव्यानंतर चर्चेला उधाण आलं आहे.
राज्यात पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीमधील घटक पक्षांनी आपआपल्या स्तरावर तयारी सुरू केली आहे. भाजपकडून विभाग स्तरावरील बैठकांचं आयोजन करण्यात येत असून, या बैठकांच्या माध्यमातून तयारीचा आढावा सुरू आहे, तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटानं देखील आपल्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुती म्हणून लढवल्या जाणार की स्वबळावर? याबाबतच चित्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही.
आता एका मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे, त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे, ते जळगावमध्ये बोलत होते. जळगाव जिल्ह्यात महायुती झाली तर ठीक, नाहीतर आगामी जिल्हा परिषद , नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी देखील आपली ताकद दाखवणार असं त्यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी जळगाव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढण्यासंदर्भात राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली आहे. महायुती झाली तर ठीक, नाहीतर आगामी जिल्हा परिषद , नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी देखील आपली ताकद दाखवणार असं त्यांनी म्हटलं आहे. ते पुढे बोलताना म्हणाले की, विधानसभा, लोकसभेत आमचा प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांविरोधात आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये प्रचार करावा का? हे न शोभणारे आहे. महायुतीतील सर्व कार्यकर्त्यांना सांभाळणं ही प्रत्येक पक्षाच्या नेत्याची जबाबदारी आहे, त्यामुळे युती झाली तर ठीक, नाही तर आम्ही सुद्धा जिल्हा परिषद, नगरपालिकांच्या सर्व जागा लढवू आणि आमच्या क्षमतेनुसार आमची ताकद दाखवू, असं अनिल पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये स्वबळाचे संकते दिले होते, त्यानंतर आता पाटील यांनी देखील मोठं विधान केल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.
राज्यातील प्रत्येक शासकीय शाळेत पोहचणार जागतिक दर्जाचे शिक्षण
मुंबई, दि. १२: गणित आणि विज्ञान विषयातील प्रत्येक विद्यार्थ्याचे पायाभूत ज्ञान दृढ करण्यावर शासनाने भर दिला आहे. या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र शासनामार्फत ‘डॉ. जयंत नारळीकर गणित आणि विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम’ राबविण्यासाठी खान अकॅडमीसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. वैज्ञानिक दृष्टीकोन आणि कुतूहल यांचा वारसा विद्यार्थ्यांमध्ये रुजविणारे प्रख्यात वैज्ञानिक डॉ. जयंत नारळीकर यांच्या सन्मानार्थ हा उपक्रम राबविला जात असून सुमारे 50 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल.
या कार्यक्रमांतर्गत शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये राज्यातील सुमारे 62 हजारांहून अधिक जिल्हा परिषद शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीसाठी खान अकॅडमीची जागतिक दर्जाची आणि महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रमाशी संलग्न असणारी गणित आणि विज्ञान विषयक शैक्षणिक सामग्री (डिजिटल कंटेंट) अध्यापन-अध्ययन प्रक्रियेत समाविष्ट केली जाईल. ही शैक्षणिक सामग्री मराठी व इंग्रजी भाषेत उपलब्ध असणार आहे. यातील व्हीडिओ वापरून शिक्षक वर्गामधील अध्यापन अधिक समृद्ध करू शकतील तसेच विद्यार्थ्यांना व्हिडिओ-आधारित धडे आणि सराव प्रश्नांच्या माध्यमातून शाळेत व घरच्या घरी संकल्पनात्मक आकलन दृढ करण्याची संधी मिळेल.
या भागीदारीचा भाग म्हणून, खान अकॅडमी इयत्ता सहावी ते दहावीसाठी असणारी विज्ञान विषयक शैक्षणिक सामग्री आता इंग्रजी आणि मराठी भाषेत तसेच महाराष्ट्र राज्य मंडळाशी संलग्न स्वरूपात उपलब्ध करून देणार आहे. याशिवाय, राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षांसाठी मराठी व इंग्रजी भाषेत शिष्यवृत्ती तयारी अभ्यासक्रम उपलब्ध करण्यात आला आहे. डिजिटल संसाधने वापरून अध्यापन प्रभावी करता यावे आणि विद्यार्थ्यांना सर्वांगीण शिक्षणाचा अनुभव देता यावा या उद्देशाने राज्यातील सर्व शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अध्यापन सहायक ‘Khanmigo’ मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम राज्य शिक्षण विभाग (शालेय शिक्षण आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली) आणि महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राबविला जाणार आहे. याचे सनियंत्रण जिल्हा शिक्षण अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद) यांच्या देखरेखीखाली, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या साहाय्याने केले जाईल. यासाठी वास्तव-वेळेतील माहिती देणारा रियल टाइम प्रोग्राम डॅशबोर्ड वापरला जाईल. यामध्ये विद्यार्थ्यांचा वापर, अध्ययनात घालवलेला वेळ व अध्ययन निष्पत्ती यांची माहिती मिळेल. यामुळे विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रगतीचे पारदर्शक पद्धतीने निरीक्षण करता येईल.
‘डॉ. जयंत नारळीकर गणित आणि विज्ञान शिक्षण वृद्धी कार्यक्रम’ राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना समान संधी देत उच्च-गुणवत्तेची आणि जागतिक दर्जाची शैक्षणिक सामग्री उपलब्ध करून देईल. प्रत्येक विद्यार्थी, त्याच्या भौगोलिक स्थान व पार्श्वभूमीची पर्वा न करता, गणित आणि विज्ञान या भविष्योन्मुख विषयांमध्ये मजबूत पाया तयार करू शकेल. या उपक्रमाद्वारे भौगोलिक व साधनसंपत्तीच्या अडचणी दूर करून, लाखो विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, कुतूहल आणि महत्वाकांक्षा यांसह शिकण्याची संधी उपलब्ध होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
सातारा, दि.११: ऐतिहासिक वास्तूंचे जतन संवर्धन करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. राज्यातील कला परंपरेचा समृद्ध वारसा जतन करण्यासाठी शासन कटिबद्ध असून औंध येथील वस्तू संग्रहालयाच्या जतन व संवर्धनासाठी शासनाने ५२ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर केला आहे. पर्यावरणाचा समतोल राखून, ऐतिहासिक वारसा जपत संग्रहालयाचे नूतनीकरण करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी दिली.
शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ८५ व्या औंध संगीत महोत्सवात ते बोलत होते. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील, खासदार नितीन पाटील, आमदार सचिन पाटील,पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक तथा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त (अतिरिक्त कार्यभार) श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, संस्थेचे सचिव अरुण कशाळकर, पंडित सुरेश तळवलकर, उल्हास कशाळकर, प्रभाकर घार्गे आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळापासून औंध संस्थान हे केवळ प्रशासकीय दृष्टिकोनातून नव्हे तर कलात्मक दृष्टिकोनातून आदर्श संस्थान म्हणून ओळखले जाते. संगीत, साहित्य, नाट्य, चित्रकला आणि नृत्य या सांस्कृतिक क्षेत्रांना औंध संस्थांनी राजाश्रय दिला. त्या काळातील दूरदृष्टी ही अत्यंत महत्त्वाची होती. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साताऱ्याच्या भूमीमध्ये जन्माला आले. साहित्य, कला, संस्कृती, क्रीडा आदी सर्वच क्षेत्रात येणाऱ्या असुविधा सोडविण्यासाठी प्रयत्न करायचा हा त्यांचा विचार घेऊन शासन काम करत आहे, असे सांगून भविष्यात शिवानंद प्रतिष्ठानला संगीत सेवा निरंतर चालू ठेवण्यासाठी निवासी गुरुकुल निर्माण करण्यासाठी सर्व सुविधा पुरवून सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, औंधचे तत्कालीन राजे बाळासाहेब पंतप्रतिनिधी अतिशय दूरदृष्टीचे शासक आणि प्रशासक होते. अप्रतिम असे वस्तुसंग्रहालय त्यांनी तयार केले. त्या वस्तू संग्रहालयाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना करून नूतनीकरण करण्यात येईल. पर्यटनाला जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्यावर शासनाचा भर आहे. ज्याप्रमाणे आपल्या तत्कालीन राजांनी कला, संस्कृती आणि मानवतेचे पुरस्कर्ते म्हणून काम केले त्याप्रमाणे शासन काम करत आहे. राजा हा प्रजेचा मायबाप मानला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकशाहीचा पाया रचला. हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यातून त्यांनी रयतेचे राज्य ही संकल्पना वास्तवात उतरवली. त्याच परंपरेचा वारसा औंध संस्थानचे राजे बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी पुढे नेला.
भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी १० वर्षे आधी पंतप्रतिनिधींनी औंध संस्थानची सत्ता जनतेच्या हातात देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. या संस्थानने लोकांना स्वतःचा प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार दिला, असे सांगून शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठान ही संस्था संस्कृतीचा दीपस्तंभ आहे या प्रतिष्ठान मुळे नवीन मंच उपलब्ध होत असून ग्रामीण भागातील स्वरांची जपणूक होत आहे त्यांच्या कार्याला सर्व ती मदत करण्यात येईल, तसेच औंधच्या क्रीडांगणाला स्टेडियमचे स्वरुप देण्यात येणार आहे, त्यासाठी औंधकरांनी सहकार्य करावे असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरुण कशाळकर यांनी केले. संगीत महोत्सवाच्या माध्यमातून प्रबोधनाचे काम होत असल्याचे सांगून निवासी गुरुकुल उभारण्यासाठी शासनाने मदत करावी, अशी विनंती केली. व कला मंदिराच्या अद्ययावतीकरणासाठी करण्यात आलेल्या मदतीबद्दल आभार मानले.
यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठानच्या ‘रियाज’ स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाला संगीतप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मदतनिधीबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी गिरासे आणि अलई कुटुंबांचे कौतुक केले. यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, डॉ. गिरासे यांच्या पत्नी शुभांगी गिरासे, मुले अद्वैका आणि कियांश, मयूर अलई यांच्या पत्नी प्रियांका अलई, मुले आरोही आणि आरव उपस्थित होते. डॉ. गिरासे आणि अलई कुटुंबाने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिलेली मदत बहुमोल असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
डॉ. गिरासे यांनी सांगितले की, मुलांनी दिवाळीत खर्च करण्याऐवजी हा खर्च मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याची इच्छा बोलून दाखविली. त्यानुसार मदतीचा धनादेश आज मुख्यमंत्र्यांकडे प्रदान करण्यात आला.
एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात नवऱ्याने बायकोचा खून केला. त्यानंतर त्याने जे शक्कल लढवली ती ऐकून तुम्हाला धक्का बसेल. चला जाणून घेऊया पोलिसांचा घामटा काढणारे हे प्रकरण काय आहे…
नवरा-बायकोचे नाते हे अतिशय सुंदर असते. कधी प्रेम तर कधी भांडणे, तसेच आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक चढउताराला ते एकत्र धीराने समोरे जातात. मात्र, याच नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. एका नवऱ्याने बायकोचा गळा दाबून जीव घेतला. त्यानंतर त्याने बायकोच्या मृतदेहाची ज्या प्रकारे विलेवाट लावली ते पाहून पोलिसांनाही घाम फुटला. आता नेमकं प्रकरण काय चला जाणून घेऊया..
केरळमधील कोट्टायमच्या शांत खोऱ्यात एक भयानक कट रचला गेला, ज्याने सुंदर नात्यावरच घाव घालण्यात आला. कोट्टायममध्ये रचली गेलेली एक भयंकर कहाणी, ज्यामध्ये प्रेमाच्या जागी आता फक्त भयावह घटनेची दहशत आहे. खरेतर, वेगळे राहणाऱ्या ५९ वर्षीय टेक्नोलॉजी एक्सपर्ट सॅम जॉर्ज याने आपल्या पत्नी जेसीचा गळा दाबून खून केला आणि नंतर तिचा मृतदेह खोल खड्ड्यात फेकून दिला. पोलिसांच्या मते, हा एक नियोजित खून होता.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
हे प्रकरण २६ सप्टेंबरचे आहे. केरळमधील कोट्टायम जिल्ह्यात एक खळबळजनक खुनाची घटना घडली. आरोपी सॅम जॉर्ज (वय ५९) याने २६ सप्टेंबरच्या रात्री आपली पत्नी जेसी सॅम (वय ५०) हिचा घरातच गळा दाबून खून केला. त्यानंतर त्याने पत्नीचा मृतदेह आपल्या कारच्या डिक्कीत ठेवला आणि रात्री १ वाजता तो ६० किलोमीटर दूर एका खोल खड्ड्यात फेकून दिला. खुनाचा पुरावा लपवण्यासाठी सॅमने जेसीचा मोबाइल फोनही खोल पाण्यात फेकून दिला.
सॅमची इराणी महिलेशी मैत्री
सॅमला एका इराणी महिला मैत्रिणीसोबत पाहिले गेले, जी एमजी विद्यापीठात योगाचे शिक्षण घेत आहे. असे सांगितले जाते की, सॅमने केवळ त्या इराणी मुलीशी मैत्री केली नाही, तर तिला एमजी विद्यापीठात शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी मदतही केली. पोलिसांनी सांगितले की, त्याच्या इराणी मैत्रिणीला या योजनेबद्दल काहीच माहिती नव्हती आणि तिने या प्रकरणाच्या तथ्यांची पुष्टी करण्यासाठी पोलिसांना महत्त्वाचे मोबाइल पुरावे देखील दिले.
आरोपीने गुन्हा कबूल केला
जेसीचा मृतदेह शुक्रवारी सापडला आणि सॅमला ताब्यात घेण्यात आले. दोन दिवसांच्या कठीण शोधानंतर मंगळवारी खोल पाण्यातून मोबाइल फोन शोधून काढला. पोलिसांच्या चौकशीत सॅमने आपला गुन्हा कबूल केला. सॅमला आज न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवरून मोठी बातमी समोर येत आहे, रशियानं आता मोठा निर्णय घेतला आहे, रशियानं भारताला मोठी ऑफर दिली आहे, हा अमेरिकेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
Source : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतावर दबाव निर्माण करण्याची सध्या एकही संधी सोडताना दिसत नाहीयेत, भारत रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून त्यांनी भारतावर अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लावला, याचाच अर्थ आता अमेरिकेमध्ये भारतीय वस्तूंवर 50 टक्के टॅरिफ आकारण्यात येत आहे, मात्र दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ लावल्यानंतर देखील भारतानं रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवली आहे. एवढंच नाही तर भारतानं आता रशियाकडून सुरू असलेल्या कच्च्या तेलाची आयात आणखी वाढवण्याची तयारी दाखवली आहे.
भारतानं रशियाकडून तेल खरेदी करणं बंद करावं, असं अमेरिकेनं म्हटलं आहे. भारत रशियाकडून तेलाची खरेदी करतो आणि ते पैसे रशिया हा युक्रेनसोबतच्या युद्धात फंड म्हणून उपयोग करतो असा आरोप अमेरिकेनं केला आहे. मात्र अमेरिकेकडून सुरू असलेल्या या आरोपांनंतर देखील भारतानं रशियाकडून तेलाची खरेदी सुरूच ठेवली आहे, भारतानं घेतलेल्या या निर्णयाचा आता फायदा होताना दिसत आहे.
FASTag च्या नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. 15 नोव्हेंबरपासून जर तुमच्या वाहनात सक्रीय फास्टॅग नसेल किंवा फास्टॅगकाम करत नसेल, तर तुम्हाला दुप्पट रक्कम भरावी लागणार नाही.
Source : वाहनचालकांसाठी आनंदाची बातमी आहे. FASTag च्या नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. 15 नोव्हेंबरपासून जर तुमच्या वाहनात सक्रीय फास्टॅग नसेल किंवा फास्टॅगकाम करत नसेल, तर तुम्हाला दुप्पट रक्कम भरावी लागणार नाही. अशा परिस्थितीत आता तुम्हाला UPI द्वारे 1.25 पट टोल टॅक्स भरावा लागेल. यामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण सध्या FASTag नसलेल्या वाहनांना दुप्पट टोल भरावा लागतो.
समोर आलेल्या माहितीनुसार सध्या 98% टोल फास्टॅगद्वारे वसूल केले जातो. ज्या वाहनांचा फास्टॅग सक्रीय नसेल किंवा काम करत नसेल तर पूर्वी दुप्पट टोल भरावा लागत होता. मात्र आता युपीआयद्वारे 1.25 पट टोल भरावा लागणार आहे. तसेच जर तुमचा फास्टॅग सक्रीय असेल मात्क टोल प्लाझा मशीनमध्ये अडचण निर्माण झाल्यास तुम्ही फुकटात टोल ओलांडू शकता. तुम्हाला टोलवर थांबण्याची किंवा टोल भरण्याची गरज नाही.
वाहनचालकांचे पैसे वाचणार
तुमच्याकडे FASTag नसेल, तर तुम्हाला आता UPI द्वारे टोल शुल्काच्या फक्त 1.25 पट रक्कम भरावी लागेल. उदाहरणार्थ, जर टोल 100 रुपये असेल तर आणि तुमचा फास्टॅग काम करत नसेल तर तुम्हाला आधी रोख 200 रुपये द्यावे लागत होते. मात्र आता केवळ UPI द्वारे 125 रुपये द्यावे लागणार आहेत. यामुळे 75 रुपयांची बचत होईल. तसेच टोल प्लाझावर रोखीने होणारे व्यवहार आणखी कमी होतील आणि भ्रष्टाचारही कमी होईल.
15 नोव्हेंबरपासून नियम लागू होणार
फास्टॅगचा हा नवा नियम 15 नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. तोपर्यंत अतिरिक्त दंड टाळण्यासाठी तुमच्या वाहनाचा FASTag तपासा आणि तो सक्रीय आहे याची खात्री करा. जर काही समस्या असेल तर ती दुरुस्त करा. यामुळे तुमचा प्रवास कमी पैशांमध्ये होईल.
टोल संकलनात वाढ
ऑगस्टमध्ये 7052.91 कोटी रुपयांचे टोल संकलन झाले होते. ही रक्कम मागील वर्षीच्या 5610.64 कोटींपेक्षा 26 टक्क्यांनी जास्त आहे. य़ाआधी मे 2025 मध्ये सर्वाधिक 7087.16 कोटींचा टोल वसूल झाला होता. जूनमध्ये हा आकडा 6700 कोटी रुपये होता. जुलैमध्ये 6500 कोटी रुपयांचा टोल जमा झाला होता.
मुंबई, दि. ९ : वीज कर्मचाऱ्यांच्या २९ पैकी सात संघटनांच्या संयुक्त कृती समितीने गुरुवार (दि. ९) पासून सुरू केलेल्या ७२ तासांच्या बेकायदेशीर संपाच्या कालावधीत महावितरणकडून राज्यभरातील वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यात आला आहे. या संपामध्ये महावितरणमधील ६२ टक्के अभियंते, अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले नाहीत.
वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या सर्व मागण्यांशी सुसंगत व सकारात्मक भूमिका महावितरणच्या व्यवस्थापनाने यापूर्वीच बैठकीमध्ये स्पष्ट केली आहे. त्याचे लेखी इतिवृत्तही संयुक्त कृती समितीला देण्यात आले आहे. तरीही ९ ऑक्टोबरपासून ७२ तासांच्या बेकायदेशीर संपाला सुरुवात करण्यात आली आहे.
वीज ही अत्यावश्यक सेवा आहे व नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी ‘महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षक अधिनियम’ म्हणजेच ‘मेस्मा’ लागू करण्यात आला आहे. त्यानुसार हा संप बेकायदेशीर असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
या तीन दिवसीय संप काळासाठी महावितरणकडून आपत्कालीन पर्यायी व्यवस्था उभारण्यात आली आहे. महावितरणमध्ये गुरूवारी (दि. ९) सुमारे ६२ टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. यासोबतच २० हजार तांत्रिक बाह्यस्त्रोत कर्मचारी (यंत्रचालक व विद्युत सहायक) कार्यरत आहेत. संपकाळात प्रामुख्याने सुरळीत वीजपुरवठ्यासाठी मुंबई येथील मुख्यालयात मुख्य अभियंता यांच्या नियंत्रणात आपत्कालीन नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे. या कक्षाद्वारे राज्यभरातील वीजपुरवठ्यावर २४ तास लक्ष ठेवण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार मनुष्यबळ व साधनसामग्रीचे नियोजन करण्यात येत आहे. यासह क्षेत्रीय कार्यालयांमध्ये देखील स्वतंत्र नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. त्याद्वारे राज्यातील वीजपुरवठ्याची स्थिती वरिष्ठ अधिकारी व मुख्यालयास कळविण्यात येत आहे.
संपकाळातील नियोजनानुसार पर्यायी मनुष्यबळ उपलब्ध करण्यात आले आहे. यात संपात सहभागी नसलेले महावितरणचे कर्मचारी, २० हजार बाह्य स्त्रोत तांत्रिक कर्मचारी, महावितरणच्या निवड सूचीवरील कंत्राटदार व कर्मचाऱ्यांची सुरळीत वीजपुरवठ्यासाठी स्थानिक कार्यालय, उपकेंद्र आदी ठिकाणी तात्पुरत्या नियुक्ती करण्यात आली आहे.
संपकाळामध्ये सुरळीत वीजपुरवठ्यासाठी सर्व क्षेत्रीय विभाग कार्यालयांच्या निवडसूचीवर असलेल्या सर्व कंत्राटदारांना आवश्यक साधनसामग्री, मनुष्यबळ व वाहनांसह संबधीत कार्यालयांमध्ये उपलब्ध झाले आहेत. वीजपुरवठा संदर्भात काही तक्रारी असल्यास नागरिकांनी मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राचे १९१२ किंवा १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ या २४ तास सुरु असलेल्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.