May 31, 2026 1:46 am

पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

मुंबई, दि. ७ : राज्यातील पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदांमुळे ग्रामीण भागातील पशुवैद्यकीय सेवांवर पडणारा ताण कमी करण्यासाठी या पदांच्या भरती प्रक्रियेला गती देण्यासाठी पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट ‘अ’च्या २ हजार ७९५ आणि सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन गट ‘अ’च्या ३०८ पदांसाठी संगणक प्रणालीवर आधारित चाळणी परीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ही परीक्षा ११ जून २०२६ रोजी मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथे होणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी केले असून संबंधित उमेदवारांची परीक्षा सायंकाळी ५.३० ते ७ या वेळेत होणार असल्याचे नमूद केले आहे. परीक्षेतील गुणांच्या आधारे स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार असून त्यानंतर पुढील निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

राज्यातील पशुसंवर्धन विभागात मोठ्या प्रमाणावर अधिकारी रिक्त असल्याने पशुवैद्यकीय सेवा, पशुधन आरोग्य तपासणी, लसीकरण आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्यात अडचणी येत होत्या. या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.

या निर्णयाबाबत आनंद व्यक्त करताना पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, खूप दिवस झाले आपण ज्या अत्यंत आनंदाच्या बातमीची प्रतीक्षा करत आहात, ती बातमी तुम्हा सर्वांना देण्यासाठी मला आनंद होत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पशुधन विकास अधिकारी गट ‘अ’ या पदासाठी २७९५ तर सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन गट ‘अ’ या पदासाठी ३०८ जागांच्या परीक्षा घेण्याचा निर्णय झालेला आहे. ११ जून २०२६ रोजी ही परीक्षा आहे. एवढे सर्व अधिकारी पशुसंवर्धन खात्यात रुजू झाल्यानंतर विभागाच्या कामाला मोठा वेग मिळेल. ग्रामीण भागातील लोकांच्या आणि त्यांच्या पशुधनाची अधिक चांगली काळजी घेणे शक्य होईल.”

या भरतीमुळे राज्यातील पशुवैद्यकीय यंत्रणेला मोठे बळ मिळणार असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करून या परीक्षेला बसणाऱ्या सर्व परीक्षार्थींना मंत्री पंकजा मुंडे यांनी शुभेच्छा दिल्या.

परभणी, दि. ६ फेब्रुवारी २०२६ — परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालय, परभणी येथे आज खिचडी वाटपाचा सामाजिक उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. परभणीतील भारतभर प्रसिद्ध असलेल्या हजरत सय्यद शाह तूराबुल हक रहे. उर्स १ १ ९ साजरी करण्यात (११९ वा स्मृतिदिन) निमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

हा उपक्रम जीवनदूत चॅरिटेबल ट्रस्ट, परभणी यांच्या वतीने राबविण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक प्राचार्य डॉ. गणेश जोशी (आवृत्ती संपादक, दैनिक लोकपत्र तथा जिल्हाध्यक्ष, वाईस ऑफ मीडिया, नांदेड) हे होते. त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी सौ. भाग्यश्री जोशी ( एमजीएम महाविद्यालय, परभणी ) यांनीही प्रत्यक्ष सहभाग घेत खिचडी वाटप केले.

रुग्णालयातील रुग्ण, त्यांच्या नातेवाईकांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे प्रभारी शेख आयुब आतार यांनी नियोजनाची जबाबदारी सांभाळली.

यावेळी जीवनदूत चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष पठाण मोहसीन खान यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते आणि आयोजकांच्या सहकार्याने रुग्णालयातील शेकडो गरजू नागरिकांना गरम व पौष्टिक खिचडीचे वाटप करण्यात आले.

सामाजिक बांधिलकी जपत रुग्णसेवेसाठी अशा प्रकारचे उपक्रम पुढेही सुरू ठेवण्याचा संकल्प आयोजकांनी यावेळी व्यक्त केले.

शौर्य, शांतता आणि जागरूकतेचा संदेश देत ‘ग्लोबल पीस ऑनर’ कार्यक्रम संपन्न

राष्ट्रीय तपास यंत्रणा प्रमुख डॉ. सदानंद दाते आणि रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्ष नीता अंबानी यांचा ग्लोबल पीस ऑनरने सन्मान 

मुंबई, दि. २२ – दहशतवादाविरुद्धचे युद्ध संपलेले नाही. या दहशतवादाच्या विरोधात लढण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सजग आणि सतर्क असले पाहिजे. कान आणि डोळे बनून सुरक्षेचे काम केले पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. दिवीजा फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ग्लोबल पीस ऑनर कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी राष्ट्रीय तपास यंत्रणेचे प्रमुख डॉ. सदानंद दाते, एनएसजी कमांडो सुनिल जोधा, रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्ष नीता अंबानी यांना ग्लोबल पीस ऑनर सन्मानाने गौरवण्यात आले.

26/11 या काळजाला भिडणाऱ्या घटनेला 17 वर्षे झाली असली तरी त्या दिवसाची वेदना आजही आपणा सर्वांच्या मनात कायम असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुंबईसह देशभरात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या या हल्ल्यातील शहीदांना आदरांजली देण्यासाठी आणि हुतात्म्यांच्या स्मृती ताज्या ठेवण्यासाठी हा कार्यक्रम महत्त्वाचा आहे. पहलगाम येथे निष्पाप नागरिकांची हत्या करून दहशतवादी संघटना देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा घटनांवरून आजही दहशतवादाचा धोका कायम असल्याचे स्पष्ट होत असून, प्रत्येक नागरिकाने सतर्क राहणे अत्यंत गरजेचे असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, 26/11 चा हल्ला हा ताज किंवा मुंबईपुरता मर्यादित नव्हता. जसा अमेरिका ’ट्विन टॉवर’ हल्ला म्हणजे अमेरिकेच्या सार्वभौमत्वावरील हल्ला होता, तसाच 26/11 चा हल्ला हा संपूर्ण भारताच्या सार्वभौमत्वाला दिलेला मोठा धक्का होता. त्या काळात ठोस प्रतिउत्तर दिले असते तर कदाचित पुन्हा असा हल्ला झाला नसता. परंतु आता परिस्थिती बदलली असून भारत मजबूत, सक्षम आणि निर्णायक देश म्हणून जगासमोर उभा आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर कारवाई करत जगाला आपली क्षमता दाखवून दिली. भारत निर्णायक कारवाई करणारा देश आहे. आज देशाची सुरक्षा यंत्रणा अत्यंत मजबूत झाली आहे. दिल्ली बॉम्बस्फोटापूर्वी सुरक्षा यंत्रणांनी मोठ्या प्रमाणात स्फोटक पदार्थ आणि शस्त्रे जप्त करून मोठा कट उधळून लावला आहे.

दहशतवादी सरळ युद्ध करू शकत नाहीत म्हणून छुपे युद्ध सुरू आहे. अशा परिस्थितीत देशातील प्रत्येक नागरिकाने सतत जागरूक राहणे गरजेचे आहे. आजच्या दिवशी शहीद हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर, तुकाराम ओंबाळे, मेजर उन्नीकृष्णन आणि प्रकाश मोरे यांसह सर्व शूरवीरांना विनम्र अभिवादन करतो.

“मुंबईची संस्कृती खंबीर आहे; ती थांबत नाही, खचत नाही” – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, 26/11 हल्ल्यात मुंबईची संस्कृती, तिचा आत्मा आणि तिची ओळख लक्ष्य करण्यात आली होती. पण मुंबई थांबली नाही आणि खचली नाही. आपण या हल्ल्याला ठाम प्रत्युत्तर दिले. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला दिलेले उत्तर हे देशाच्या बदललेल्या सामर्थ्याचे द्योतक आहे.

सदानंद दाते आणि नीता अंबानी यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांनी सांगितले की, “अशा व्यक्तींचा देशाला अभिमान आहे.”

कार्यक्रमात 26/11 हल्ल्यात अतुलनीय धैर्य दाखवणारे वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेचे प्रमुख डॉ. सदानंद दाते यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कामा रुग्णालयातील ग्रेनेड हल्ल्यात गंभीर जखमी असूनही त्यांनी मागे न हटता अतिरेक्यांचा सामना केला आणि त्यांचा शेवट केला.

शांतीदूत म्हणून काम करत असलेल्या आणि समाजामध्ये सकारात्मकता निर्माण करणाऱ्या रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्ष नीता अंबानी यांचा गौरव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच 26/11 हल्ल्यात अतुलनीय शौर्य दाखवणारे आणि ‘जिंदा शहीद’ म्हणून ओळखले जाणारे सुनिल जोधा यांनाही गौरवण्यात आले. श्री जोधा यांनी या हल्ल्यावेळी शरीरावर 20 गोळ्या झेलल्या ज्यातील एक आजही त्यांच्या शरीरात आहे.

या कार्यक्रमामध्ये पहलगाम हल्ल्यात जीव गमावलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांनाही सन्मानित करण्यात आले तसेच 26/11 या हल्ल्यातील शहिदांच्या कुटुंबीयांनाही सन्मानित करण्यात आले.


परभणीः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर अध्यक्ष अब्दुल माजिद यांच्या उपस्थीतीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला राष्ट्रीय अध्यक्षा तथा राज्यसभा खासदार डॉ फौजिया खान यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी मध्ये पक्षाची दिशा व पक्षा तर्फ उभे करण्यात येणारे उमेदवारांचे निवडी करीता कार्यक्रम जाहिर केला. खासदार डॉ फौजिया खान यांनी जिल्हयात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सध्या सुरु असलेल्या नगर परिषद निवडणुकीत सेलू येथे नगर अध्यक्ष व सदस्य पदाकरीता, तसेच जितुर, पुर्णा, गंगाखेड या नगर परिषद येथे सदस्य पदासाठी निवडणुक लढवित आहे. तर सोनपेठ येथे सहयोगी पक्षा तर्फे अधाडीत लढत आहेत असे सांगीतले. परभणी महानगर पालीका व जिल्हा परिषद पंचायत समिती चे आमामी निवडणूका स्वबळावर लढण्याचा निर्धार व्यक्त केला.
महानगर पालीकेच्या निवडणुकीमध्ये निवडणुक लढविणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी पक्षाचे शहर अध्यक्ष यांचेकडे दिनांक 23 नोव्हेंबर पासुन 4 डिसेंबर पर्यंत त्यांचे अर्ज व कागदपत्रे मुलाखतीसाठी सादर करावी असे जाहिर केले. या उमेदवारांचे अर्जा वरुन त्यांचे मुलाखती घेण्यात येईल आणि सुजान व सुसंस्कृत असलेले उमेदवार परभणी महानगर पालीकेमध्ये पक्षातर्फे उभे करण्यात येतील असे जाहिर केले. जिल्हयातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकी साठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज दिनांक 21 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर या काळात पक्षाचे परभणी येथील राष्ट्रवादी भवन येथे जमा करण्याचे काम सुरु झाले आहे असे सांगीतले. आगामी निवडणुकीत शेतकऱ्यांची होत असलेली हेळसांड व त्यांच्या होत असलेल्या आत्महत्या या सरकारच्या उदासीन धोरणामुळे होत आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा शेतकऱ्यां सोबत उभा राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेस परभणीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर अध्यक्ष अब्दुल माजिद, पक्षाचे प्रदेश कार्यकारणीतील श्री दशरथ तुपसुंदर, रहेमान पठाण, अब्दुल खालीद, रामा आडे, वनिता चव्हाण मॅडम, तहसीन खान व इतर उपस्थित होते.

FASTag च्या नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. 15 नोव्हेंबरपासून जर तुमच्या वाहनात सक्रीय फास्टॅग नसेल किंवा फास्टॅगकाम करत नसेल, तर तुम्हाला दुप्पट रक्कम भरावी लागणार नाही.

परभणी, २४ ऑक्टोबर २०२५ – समाजसेवेसाठी कार्यरत जीवन दूत या चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आज परभणी येथे गरजू नागरिकांसाठी फळवाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या उपक्रमात संस्थेचे अध्यक्ष मोहसीन खान , विश्वस्त मंडळाचे सदस्य, कार्यक्रमाचे आयोजक (Programme Manager)तसेच संस्थेचे महाराष्ट्र राज्य संघटक शेख आयुब शेख रशीद आतार ,महिला संघटक आफ्रिन शेख आयुब व अफ्रिन सुलतान शेख कलीम व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचा उद्देश गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपर्यंत आरोग्यदायी आणि पौष्टिक आहार पोहोचविणे हा होता.

कार्यक्रमादरम्यान सफरचंद, केळी, संत्री, पेरू आणि इतर हंगामी फळांचे वितरण करण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष मोहसीन खान (एम जे मास मीडिया ) म्हणाले, “आरोग्य हेच खरे धन आहे. आपल्या समाजातील प्रत्येक व्यक्ती निरोगी राहावी, यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.”

स्थानिक नागरिकांनीही या सामाजिक उपक्रमाचे मनःपूर्वक स्वागत केले आणि संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. लवकरच संस्थेकडून अशाच आणखी उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे विश्वस्तांनी सांगितले.

www.jeevandoot.org.in

राज्यात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर दिवाळीआधी शेतकऱ्यांना मदत देण्यास सरकारकडून सुरुवात झाली आहे.

farmer using mobile checking report of agriculture in farm

Heavy Rain Affected Farmers Assistance : काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाडा तसेच विदर्भ आणि महाराष्ट्रातील इतर भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी जमीन खरडून गेली. तर काही ठिकाणी शेतातील उभे पीक पाण्याखाली गेली. हे नुकसान लक्षात घेऊन सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 31 हजार कोटींची आर्थिक मदत जाहीर केली. ही मदत नेमकी कधी मिळणार याबाबत अनिश्चितता होती. आता मात्र याबाबतचा संभ्रम दूर झाला आहे. सरकारने एक आदेश जारी केला आहे. या आदेशात सरकारने 480 कोटी रुपयांच्य वाटपास मंजुरी दिली आहे. म्हणजेच आता शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीआधाची पैसे येण्याची शक्यता वाढली आहे. दिवाळीपूर्वीच पैसे वाटपाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

राज्यात पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, मात्र त्याचपूर्वी महायुतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्याच्या वक्तव्यानंतर चर्चेला उधाण आलं आहे.

राज्यात पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे.  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीमधील घटक पक्षांनी आपआपल्या स्तरावर तयारी सुरू केली आहे. भाजपकडून विभाग स्तरावरील बैठकांचं आयोजन करण्यात येत असून, या बैठकांच्या माध्यमातून तयारीचा आढावा सुरू आहे, तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटानं देखील आपल्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुती म्हणून लढवल्या जाणार की स्वबळावर? याबाबतच चित्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही.

आता एका मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे, त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे, ते जळगावमध्ये बोलत होते. जळगाव जिल्ह्यात महायुती झाली तर ठीक, नाहीतर आगामी जिल्हा परिषद , नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी देखील आपली ताकद दाखवणार असं त्यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी जळगाव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढण्यासंदर्भात राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली आहे. महायुती झाली तर ठीक, नाहीतर आगामी जिल्हा परिषद , नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी देखील आपली ताकद दाखवणार असं त्यांनी म्हटलं आहे. ते पुढे बोलताना म्हणाले की,  विधानसभा, लोकसभेत आमचा प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांविरोधात आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये प्रचार करावा का? हे न शोभणारे आहे. महायुतीतील सर्व कार्यकर्त्यांना सांभाळणं ही प्रत्येक पक्षाच्या नेत्याची जबाबदारी आहे, त्यामुळे  युती झाली तर ठीक, नाही तर आम्ही सुद्धा जिल्हा परिषद, नगरपालिकांच्या सर्व जागा लढवू आणि आमच्या क्षमतेनुसार आमची ताकद दाखवू, असं अनिल पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये स्वबळाचे संकते दिले होते,  त्यानंतर आता पाटील यांनी देखील मोठं विधान केल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.

राज्यातील प्रत्येक शासकीय शाळेत पोहचणार जागतिक दर्जाचे शिक्षण

मुंबई, दि. १२: गणित आणि विज्ञान विषयातील प्रत्येक विद्यार्थ्याचे पायाभूत ज्ञान दृढ करण्यावर शासनाने भर दिला आहे. या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र शासनामार्फत ‘डॉ. जयंत नारळीकर गणित आणि विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम’ राबविण्यासाठी खान अकॅडमीसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. वैज्ञानिक दृष्टीकोन आणि कुतूहल यांचा वारसा विद्यार्थ्यांमध्ये रुजविणारे प्रख्यात वैज्ञानिक डॉ. जयंत नारळीकर यांच्या सन्मानार्थ हा उपक्रम राबविला जात असून सुमारे 50 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल.

या कार्यक्रमांतर्गत शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये राज्यातील सुमारे 62 हजारांहून अधिक जिल्हा परिषद शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीसाठी खान अकॅडमीची जागतिक दर्जाची आणि महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रमाशी संलग्न असणारी गणित आणि विज्ञान विषयक शैक्षणिक सामग्री (डिजिटल कंटेंट) अध्यापन-अध्ययन प्रक्रियेत समाविष्ट केली जाईल. ही शैक्षणिक सामग्री मराठी व इंग्रजी भाषेत उपलब्ध असणार आहे. यातील व्हीडिओ वापरून शिक्षक वर्गामधील अध्यापन अधिक समृद्ध करू शकतील तसेच विद्यार्थ्यांना व्हिडिओ-आधारित धडे आणि सराव प्रश्नांच्या माध्यमातून शाळेत व घरच्या घरी संकल्पनात्मक आकलन दृढ करण्याची संधी मिळेल.

या भागीदारीचा भाग म्हणून, खान अकॅडमी इयत्ता सहावी ते दहावीसाठी असणारी विज्ञान विषयक शैक्षणिक सामग्री आता इंग्रजी आणि मराठी भाषेत तसेच महाराष्ट्र राज्य मंडळाशी संलग्न स्वरूपात उपलब्ध करून देणार आहे. याशिवाय, राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षांसाठी मराठी व इंग्रजी भाषेत शिष्यवृत्ती तयारी अभ्यासक्रम उपलब्ध करण्यात आला आहे. डिजिटल संसाधने वापरून अध्यापन प्रभावी करता यावे आणि विद्यार्थ्यांना सर्वांगीण शिक्षणाचा अनुभव देता यावा या उद्देशाने राज्यातील सर्व शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अध्यापन सहायक ‘Khanmigo’ मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

हा कार्यक्रम राज्य शिक्षण विभाग (शालेय शिक्षण आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली) आणि महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राबविला जाणार आहे. याचे सनियंत्रण जिल्हा शिक्षण अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद) यांच्या देखरेखीखाली, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या साहाय्याने केले जाईल. यासाठी वास्तव-वेळेतील माहिती देणारा रियल टाइम प्रोग्राम डॅशबोर्ड वापरला जाईल. यामध्ये विद्यार्थ्यांचा वापर, अध्ययनात घालवलेला वेळ व अध्ययन निष्पत्ती यांची माहिती मिळेल. यामुळे विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रगतीचे पारदर्शक पद्धतीने निरीक्षण करता येईल.

‘डॉ. जयंत नारळीकर गणित आणि विज्ञान शिक्षण वृद्धी कार्यक्रम’ राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना समान संधी देत उच्च-गुणवत्तेची आणि जागतिक दर्जाची शैक्षणिक सामग्री उपलब्ध करून देईल. प्रत्येक विद्यार्थी, त्याच्या भौगोलिक स्थान व पार्श्वभूमीची पर्वा न करता, गणित आणि विज्ञान या भविष्योन्मुख विषयांमध्ये मजबूत पाया तयार करू शकेल. या उपक्रमाद्वारे भौगोलिक व साधनसंपत्तीच्या अडचणी दूर करून, लाखो विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, कुतूहल आणि महत्वाकांक्षा यांसह शिकण्याची संधी उपलब्ध होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

सातारा, दि.११: ऐतिहासिक वास्तूंचे जतन संवर्धन करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. राज्यातील कला परंपरेचा समृद्ध वारसा जतन करण्यासाठी शासन कटिबद्ध असून औंध येथील वस्तू संग्रहालयाच्या जतन व संवर्धनासाठी शासनाने ५२ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर केला आहे. पर्यावरणाचा समतोल राखून, ऐतिहासिक वारसा जपत संग्रहालयाचे नूतनीकरण करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी दिली.

शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ८५ व्या औंध संगीत महोत्सवात ते बोलत होते. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील, खासदार नितीन पाटील, आमदार सचिन पाटील,पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक तथा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त (अतिरिक्त कार्यभार) श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, संस्थेचे सचिव अरुण कशाळकर, पंडित सुरेश तळवलकर, उल्हास कशाळकर, प्रभाकर घार्गे आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळापासून औंध संस्थान हे केवळ प्रशासकीय दृष्टिकोनातून नव्हे तर कलात्मक दृष्टिकोनातून आदर्श संस्थान म्हणून ओळखले जाते. संगीत, साहित्य, नाट्य, चित्रकला आणि नृत्य या सांस्कृतिक क्षेत्रांना औंध संस्थांनी राजाश्रय दिला. त्या काळातील दूरदृष्टी ही अत्यंत महत्त्वाची होती. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साताऱ्याच्या भूमीमध्ये जन्माला आले. साहित्य, कला, संस्कृती, क्रीडा आदी सर्वच क्षेत्रात येणाऱ्या असुविधा सोडविण्यासाठी प्रयत्न करायचा हा त्यांचा विचार घेऊन शासन काम करत आहे, असे सांगून भविष्यात शिवानंद प्रतिष्ठानला संगीत सेवा निरंतर चालू ठेवण्यासाठी निवासी गुरुकुल निर्माण करण्यासाठी सर्व सुविधा पुरवून सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, औंधचे तत्कालीन राजे बाळासाहेब पंतप्रतिनिधी अतिशय दूरदृष्टीचे शासक आणि प्रशासक होते. अप्रतिम असे वस्तुसंग्रहालय त्यांनी तयार केले. त्या वस्तू संग्रहालयाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना करून नूतनीकरण करण्यात येईल. पर्यटनाला जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्यावर शासनाचा भर आहे. ज्याप्रमाणे आपल्या तत्कालीन राजांनी कला, संस्कृती आणि मानवतेचे पुरस्कर्ते म्हणून काम केले त्याप्रमाणे शासन काम करत आहे. राजा हा प्रजेचा मायबाप मानला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकशाहीचा पाया रचला. हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यातून त्यांनी रयतेचे राज्य ही संकल्पना वास्तवात उतरवली. त्याच परंपरेचा वारसा औंध संस्थानचे राजे बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी पुढे नेला.

भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी १० वर्षे आधी पंतप्रतिनिधींनी औंध संस्थानची सत्ता जनतेच्या हातात देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. या संस्थानने लोकांना स्वतःचा प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार दिला, असे सांगून शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठान ही संस्था संस्कृतीचा दीपस्तंभ आहे या प्रतिष्ठान मुळे नवीन मंच उपलब्ध होत असून ग्रामीण भागातील स्वरांची जपणूक होत आहे त्यांच्या कार्याला सर्व ती मदत करण्यात येईल, तसेच औंधच्या क्रीडांगणाला स्टेडियमचे स्वरुप देण्यात येणार आहे, त्यासाठी औंधकरांनी सहकार्य करावे असेही ते म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरुण कशाळकर यांनी केले. संगीत महोत्सवाच्या माध्यमातून प्रबोधनाचे काम होत असल्याचे सांगून निवासी गुरुकुल उभारण्यासाठी शासनाने मदत करावी, अशी विनंती केली. व कला मंदिराच्या अद्ययावतीकरणासाठी करण्यात आलेल्या मदतीबद्दल आभार मानले.

यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठानच्या ‘रियाज’ स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

कार्यक्रमाला संगीतप्रेमी मोठ‌्या संख्येने उपस्थित होते.