April 19, 2026 3:06 pm

October 12, 2025

राज्यात पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, मात्र त्याचपूर्वी महायुतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्याच्या वक्तव्यानंतर चर्चेला उधाण आलं आहे.

राज्यात पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे.  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीमधील घटक पक्षांनी आपआपल्या स्तरावर तयारी सुरू केली आहे. भाजपकडून विभाग स्तरावरील बैठकांचं आयोजन करण्यात येत असून, या बैठकांच्या माध्यमातून तयारीचा आढावा सुरू आहे, तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटानं देखील आपल्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुती म्हणून लढवल्या जाणार की स्वबळावर? याबाबतच चित्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही.

आता एका मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे, त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे, ते जळगावमध्ये बोलत होते. जळगाव जिल्ह्यात महायुती झाली तर ठीक, नाहीतर आगामी जिल्हा परिषद , नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी देखील आपली ताकद दाखवणार असं त्यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी जळगाव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढण्यासंदर्भात राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली आहे. महायुती झाली तर ठीक, नाहीतर आगामी जिल्हा परिषद , नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी देखील आपली ताकद दाखवणार असं त्यांनी म्हटलं आहे. ते पुढे बोलताना म्हणाले की,  विधानसभा, लोकसभेत आमचा प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांविरोधात आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये प्रचार करावा का? हे न शोभणारे आहे. महायुतीतील सर्व कार्यकर्त्यांना सांभाळणं ही प्रत्येक पक्षाच्या नेत्याची जबाबदारी आहे, त्यामुळे  युती झाली तर ठीक, नाही तर आम्ही सुद्धा जिल्हा परिषद, नगरपालिकांच्या सर्व जागा लढवू आणि आमच्या क्षमतेनुसार आमची ताकद दाखवू, असं अनिल पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये स्वबळाचे संकते दिले होते,  त्यानंतर आता पाटील यांनी देखील मोठं विधान केल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.

राज्यातील प्रत्येक शासकीय शाळेत पोहचणार जागतिक दर्जाचे शिक्षण

मुंबई, दि. १२: गणित आणि विज्ञान विषयातील प्रत्येक विद्यार्थ्याचे पायाभूत ज्ञान दृढ करण्यावर शासनाने भर दिला आहे. या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र शासनामार्फत ‘डॉ. जयंत नारळीकर गणित आणि विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम’ राबविण्यासाठी खान अकॅडमीसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. वैज्ञानिक दृष्टीकोन आणि कुतूहल यांचा वारसा विद्यार्थ्यांमध्ये रुजविणारे प्रख्यात वैज्ञानिक डॉ. जयंत नारळीकर यांच्या सन्मानार्थ हा उपक्रम राबविला जात असून सुमारे 50 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल.

या कार्यक्रमांतर्गत शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये राज्यातील सुमारे 62 हजारांहून अधिक जिल्हा परिषद शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीसाठी खान अकॅडमीची जागतिक दर्जाची आणि महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रमाशी संलग्न असणारी गणित आणि विज्ञान विषयक शैक्षणिक सामग्री (डिजिटल कंटेंट) अध्यापन-अध्ययन प्रक्रियेत समाविष्ट केली जाईल. ही शैक्षणिक सामग्री मराठी व इंग्रजी भाषेत उपलब्ध असणार आहे. यातील व्हीडिओ वापरून शिक्षक वर्गामधील अध्यापन अधिक समृद्ध करू शकतील तसेच विद्यार्थ्यांना व्हिडिओ-आधारित धडे आणि सराव प्रश्नांच्या माध्यमातून शाळेत व घरच्या घरी संकल्पनात्मक आकलन दृढ करण्याची संधी मिळेल.

या भागीदारीचा भाग म्हणून, खान अकॅडमी इयत्ता सहावी ते दहावीसाठी असणारी विज्ञान विषयक शैक्षणिक सामग्री आता इंग्रजी आणि मराठी भाषेत तसेच महाराष्ट्र राज्य मंडळाशी संलग्न स्वरूपात उपलब्ध करून देणार आहे. याशिवाय, राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षांसाठी मराठी व इंग्रजी भाषेत शिष्यवृत्ती तयारी अभ्यासक्रम उपलब्ध करण्यात आला आहे. डिजिटल संसाधने वापरून अध्यापन प्रभावी करता यावे आणि विद्यार्थ्यांना सर्वांगीण शिक्षणाचा अनुभव देता यावा या उद्देशाने राज्यातील सर्व शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अध्यापन सहायक ‘Khanmigo’ मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

हा कार्यक्रम राज्य शिक्षण विभाग (शालेय शिक्षण आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली) आणि महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राबविला जाणार आहे. याचे सनियंत्रण जिल्हा शिक्षण अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद) यांच्या देखरेखीखाली, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या साहाय्याने केले जाईल. यासाठी वास्तव-वेळेतील माहिती देणारा रियल टाइम प्रोग्राम डॅशबोर्ड वापरला जाईल. यामध्ये विद्यार्थ्यांचा वापर, अध्ययनात घालवलेला वेळ व अध्ययन निष्पत्ती यांची माहिती मिळेल. यामुळे विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रगतीचे पारदर्शक पद्धतीने निरीक्षण करता येईल.

‘डॉ. जयंत नारळीकर गणित आणि विज्ञान शिक्षण वृद्धी कार्यक्रम’ राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना समान संधी देत उच्च-गुणवत्तेची आणि जागतिक दर्जाची शैक्षणिक सामग्री उपलब्ध करून देईल. प्रत्येक विद्यार्थी, त्याच्या भौगोलिक स्थान व पार्श्वभूमीची पर्वा न करता, गणित आणि विज्ञान या भविष्योन्मुख विषयांमध्ये मजबूत पाया तयार करू शकेल. या उपक्रमाद्वारे भौगोलिक व साधनसंपत्तीच्या अडचणी दूर करून, लाखो विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, कुतूहल आणि महत्वाकांक्षा यांसह शिकण्याची संधी उपलब्ध होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

सातारा, दि.११: ऐतिहासिक वास्तूंचे जतन संवर्धन करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. राज्यातील कला परंपरेचा समृद्ध वारसा जतन करण्यासाठी शासन कटिबद्ध असून औंध येथील वस्तू संग्रहालयाच्या जतन व संवर्धनासाठी शासनाने ५२ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर केला आहे. पर्यावरणाचा समतोल राखून, ऐतिहासिक वारसा जपत संग्रहालयाचे नूतनीकरण करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी दिली.

शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ८५ व्या औंध संगीत महोत्सवात ते बोलत होते. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील, खासदार नितीन पाटील, आमदार सचिन पाटील,पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक तथा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त (अतिरिक्त कार्यभार) श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, संस्थेचे सचिव अरुण कशाळकर, पंडित सुरेश तळवलकर, उल्हास कशाळकर, प्रभाकर घार्गे आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळापासून औंध संस्थान हे केवळ प्रशासकीय दृष्टिकोनातून नव्हे तर कलात्मक दृष्टिकोनातून आदर्श संस्थान म्हणून ओळखले जाते. संगीत, साहित्य, नाट्य, चित्रकला आणि नृत्य या सांस्कृतिक क्षेत्रांना औंध संस्थांनी राजाश्रय दिला. त्या काळातील दूरदृष्टी ही अत्यंत महत्त्वाची होती. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साताऱ्याच्या भूमीमध्ये जन्माला आले. साहित्य, कला, संस्कृती, क्रीडा आदी सर्वच क्षेत्रात येणाऱ्या असुविधा सोडविण्यासाठी प्रयत्न करायचा हा त्यांचा विचार घेऊन शासन काम करत आहे, असे सांगून भविष्यात शिवानंद प्रतिष्ठानला संगीत सेवा निरंतर चालू ठेवण्यासाठी निवासी गुरुकुल निर्माण करण्यासाठी सर्व सुविधा पुरवून सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, औंधचे तत्कालीन राजे बाळासाहेब पंतप्रतिनिधी अतिशय दूरदृष्टीचे शासक आणि प्रशासक होते. अप्रतिम असे वस्तुसंग्रहालय त्यांनी तयार केले. त्या वस्तू संग्रहालयाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना करून नूतनीकरण करण्यात येईल. पर्यटनाला जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्यावर शासनाचा भर आहे. ज्याप्रमाणे आपल्या तत्कालीन राजांनी कला, संस्कृती आणि मानवतेचे पुरस्कर्ते म्हणून काम केले त्याप्रमाणे शासन काम करत आहे. राजा हा प्रजेचा मायबाप मानला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकशाहीचा पाया रचला. हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यातून त्यांनी रयतेचे राज्य ही संकल्पना वास्तवात उतरवली. त्याच परंपरेचा वारसा औंध संस्थानचे राजे बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी पुढे नेला.

भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी १० वर्षे आधी पंतप्रतिनिधींनी औंध संस्थानची सत्ता जनतेच्या हातात देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. या संस्थानने लोकांना स्वतःचा प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार दिला, असे सांगून शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठान ही संस्था संस्कृतीचा दीपस्तंभ आहे या प्रतिष्ठान मुळे नवीन मंच उपलब्ध होत असून ग्रामीण भागातील स्वरांची जपणूक होत आहे त्यांच्या कार्याला सर्व ती मदत करण्यात येईल, तसेच औंधच्या क्रीडांगणाला स्टेडियमचे स्वरुप देण्यात येणार आहे, त्यासाठी औंधकरांनी सहकार्य करावे असेही ते म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरुण कशाळकर यांनी केले. संगीत महोत्सवाच्या माध्यमातून प्रबोधनाचे काम होत असल्याचे सांगून निवासी गुरुकुल उभारण्यासाठी शासनाने मदत करावी, अशी विनंती केली. व कला मंदिराच्या अद्ययावतीकरणासाठी करण्यात आलेल्या मदतीबद्दल आभार मानले.

यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठानच्या ‘रियाज’ स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

कार्यक्रमाला संगीतप्रेमी मोठ‌्या संख्येने उपस्थित होते.